क्राईम

 कुत्रा चावल्याने तरुणाचा जीव टांगणीला; लसीअभावी रुग्णालयांची सैर; अखेर सामूहिक प्रयत्नांतून आले यश!


 

 कुत्रा चावल्याने तरुणाचा जीव टांगणीला; लसीअभावी रुग्णालयांची सैर; अखेर सामूहिक प्रयत्नांतून आले यश!

 

येवला/ प्रतिनिधी

उतरन (ता. एरंडोल, जि. नाशिक) येथील साई दिंडी यात्रेत सहभागी असलेला रोहित संदीप पाटील (वय १९) या तरुणास मातुलठाण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावले. परंतु रेबीज प्रतिबंधक लसीच्या अनुपलब्धतेमुळे त्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती.

ग्रामस्थांनी तत्काळ प्रतिसाद देत त्याला नगरसूल, राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, मात्र तेथे लस नव्हती. नंतर येवला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथेही लसीचा शून्य साठा असल्याचे समोर आलं.

Advertisement

ही बाब शंकर नागरे या युवकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते भागवतराव सोनवणे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष खैरनार यांच्या पर्यंत पोहोचलं. त्यांनी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधून लस मिळवून तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवली.

दरम्यान, रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचे आनंद शिंदे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध असल्याची खात्री करून रुग्णाला तिथे हलवले. तेथे पाच लसींचे डोस देण्यात आले, आणि सकाळपर्यंत रुग्णाची प्रकृती स्थिर झाली.

या प्रसंगात येवला शहर व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले. संतोष खैरनार, आनंद शिंदे, अतुल घटे, योगेश सोनवणे यांच्या संवेदनशील व तातडीच्या प्रतिसादामुळे एक तरुण जीव वाचला.

प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो – रेबीजसारख्या गंभीर आजारासाठी लस गावपातळीवरील आरोग्य केंद्रात नसणे ही आरोग्य व्यवस्थेची गंभीर त्रुटी नाही का?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *