पत्रकारितेची दशा आणि दिशा :अनुभवांची मिसळ भाग ४९:कुमार कडलग, नाशिक …………… *खंडणीखोर पत्रकारितेची “महा”जनकी!*
पत्रकारितेची दशा आणि दिशा :अनुभवांची मिसळ भाग ४९:कुमार कडलग, नाशिक
……………
खंडणीखोर पत्रकारितेची “महा”जनकी!
……..
पत्रकारिता ही लोकशाहीची अनौपचारिक पण अत्यंत प्रभावी संस्था मानली जाते. समाजाच्या वतीने प्रश्न विचारणे, सत्तेला जाब विचारणे, भ्रष्टाचार उघड करणे आणि जनहिताचे मुद्दे पुढे आणणे ही तिची भूमिका आहे. पण जेव्हा पत्रकारितेच्या नावाभोवती खंडणी, ब्लॅकमेलिंग, दबाव आणि आर्थिक व्यवहारांच्या चर्चा सुरू होतात, तेव्हा प्रश्न केवळ काही व्यक्तींचा राहत नाही; तो संपूर्ण पत्रकारितेच्या विश्वासार्हतेचा बनतो.
सध्या काही कथित पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींविरोधातील गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगपतींना धमकावणे, बदनामीची भीती दाखवणे, बातम्यांचा दबाव निर्माण करणे आणि आर्थिक व्यवहार घडवून आणणे अशा स्वरूपाचे आरोप चर्चेत आहेत. काही वृत्तांनुसार या प्रकरणात स्टिंग ऑपरेशन, संभाषणांचे रेकॉर्डिंग आणि आर्थिक व्यवहारांचे कथित पुरावे समोर आल्याचे दावेही केले जात आहेत.
या सर्व दाव्यांचे सत्य तपास यंत्रणाच ठरवतील.अर्थात गुन्हा दाखल करून तपासावर घेतले तर. पण या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. पत्रकारितेत ही “महाजनकी” आली कुठून?
एकेकाळी कर्ज देऊन व्याज वसूल करणारा तो महाजन, अशी संभावना होती.. आज काही कथित प्रवृत्ती माहिती, बातमी किंवा प्रसिद्धीचा प्रभाव वापरून दबाव निर्माण करतात, अशी समाजात चर्चा आहे. पूर्वी बातमी ही जनहितासाठी प्रसिद्ध केली जात असे; आता काही ठिकाणी बातमीच कथितपणे सौदेबाजीचे साधन बनत असल्याची भावना लोकांमध्ये वाढू लागली आहे.
पत्रकारितेची खरी ताकद सत्यात असते. पण जेव्हा सत्य हेच व्यवहाराचे हत्यार बनते, तेव्हा पत्रकारिता आपली नैतिकता गमावते.
विशेष चिंतेची बाब म्हणजे या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्ती, संपादक किंवा मोठ्या माध्यम संस्थांशी संबंधित नावांची चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.हे आरोप निराधार असतील, तर चौकशीतून संबंधतींचे निर्दोषत्व सिद्ध व्हायला हवे. पण जर आरोपांमध्ये तथ्य असेल, तर मग कारवाई कुणावरही असो, ती तितक्याच कठोरपणे व्हायला हवी.
याठिकाणी आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण होतो पोलीस यंत्रणेची भूमिका काय?
सामान्य नागरिकावर, छोट्या किंवा स्वतंत्र पत्रकारावर खंडणीचे आरोप झाले असते, तर तपासाची गती वेगळी दिसली असती का? पुरावे असल्याचे दावे होत असताना तपास कुठपर्यंत पोहोचला? संबंधित व्यक्तींची चौकशी झाली का? कथित आर्थिक व्यवहारांची पडताळणी झाली का? हे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.
म्हणूनच या प्रकरणात पोलीसांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जात आहे. कारण पत्रकारिता आणि पोलीस यंत्रणा या दोन्ही संस्था लोकविश्वासावर उभ्या आहेत. एका संस्थेवर आरोप झाले आणि दुसरी संस्था निष्क्रिय दिसली, तर संशय अधिक गडद होतो.
सर्वात मोठी शोकांतिका मात्र दुसरी आहे.
आज समाजात प्रामाणिक पत्रकारांची संख्या कमी नाही. गावोगावी उन्हात पावसात फिरून जनतेचे प्रश्न मांडणारे, भ्रष्टाचार उघड करणारे, सत्तेला जाब विचारणारे अनेक पत्रकार निष्ठेने काम करत आहेत. पण काही कथित व्यक्तींच्या वर्तनामुळे संपूर्ण पत्रकारितेवर संशयाची सावट घोंगावते.
आज लोक एखादी बातमी वाचताना तिच्या आशयापेक्षा तिच्यामागे “काही व्यवहार झाला असेल का?” असा प्रश्न विचारू लागले, तर ते पत्रकारितेचे सर्वात मोठे अपयश आहे.
पत्रकार हा कायद्यापेक्षा मोठा नाही.
त्याला घटनेने सामान्य नागरिकांपेक्षा वेगळे अधिकार दिलेले नाहीत.
उलट त्याच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा असते. कारण त्याच्या हातात समाजमत घडविण्याची ताकद असते.
पत्रकारितेचे रूपांतर जर प्रभावाच्या बाजारात झाले, तर लेखणीची जागा दलाली घेते. प्रश्नांची जागा व्यवहार घेतात. आणि समाजाचा विश्वास ढासळू लागतो.
आज प्रश्न केवळ कथित खंडणी प्रकरणाचा नाही. प्रश्न आहे पत्रकारितेच्या आत्मपरीक्षणाचा.
कारण पत्रकारितेचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो.
तो पत्रकारितेच्या नावाखाली वाढणाऱ्या अशा प्रवृत्तींमध्येच दडलेला असतो.
म्हणूनच या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वंकष चौकशी होणे आवश्यक आहे. आरोप खोटे असतील तर सत्य बाहेर यायला हवे. आरोप खरे असतील तर कायद्याने आपले काम करायला हवे.
कारण लोकशाहीत पत्रकारितेचे संरक्षण व्यक्तींसाठी नसते; ते मूल्यांसाठी असते.
आणि जेव्हा मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते, तेव्हा “महा”जनकी आणि पत्रकारिता यांच्यातील फरक स्पष्टपणे दाखवणे हीच काळाची गरज ठरते.
-दुनियादारी won’t lie
(पुढील भागात “कार्पोरेट खंडणीच्या ओझ्याखाली दबलेली नैतिकता”)

