डिजिटल प्रशासनात महाराष्ट्राची झेप! ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद अव्वल; सांगली, ठाणे, नागपूर, नाशिक टॉप-५ मध्ये
डिजिटल प्रशासनात महाराष्ट्राची झेप!
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद अव्वल; सांगली, ठाणे, नागपूर, नाशिक टॉप-५ मध्ये
मुंबई | विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची घोषणा करण्यात आली असून डिजिटल प्रशासनाच्या स्पर्धेत पुणे जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. तंत्रज्ञानाधारित कामकाज, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांच्या डिजिटल परिवर्तनाला वेग मिळाल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे.
कार्यालयीन कामकाज अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, डिजिटल डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व ब्लॉकचेनचा वापर तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा सात प्रमुख निकषांवर मूल्यांकन करण्यात आले.
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद संवर्गाचा निकाल अखेर जाहीर झाला असून पुढील जिल्हा परिषदांनी अव्वल स्थान मिळवले आहे —
जिल्हा परिषद गुणांकन (१०० पैकी)
👉 पुणे जिल्हा परिषद – ११६.२५ गुण | प्रथम स्थान
👉 सांगली जिल्हा परिषद – ११५.०० गुण | द्वितीय स्थान
👉 ठाणे जिल्हा परिषद – ११६.२५ गुण | तृतीय स्थान
👉 नागपूर जिल्हा परिषद – १०२.२५ गुण | चतुर्थ स्थान
👉 नाशिक जिल्हा परिषद – ९६.७५ गुण | पाचवे स्थान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करत डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महाराष्ट्राने घेतलेली ही मोठी झेप असल्याचे सांगितले. विजेत्या जिल्हा परिषदांचा राज्य शासनातर्फे लवकरच गौरव करण्यात येणार आहे.
डिजिटल परिवर्तनाला वेग
या उपक्रमामुळे शासकीय सेवांमध्ये वेग, पारदर्शकता आणि नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.



