क्राईम

✍️ संपादकीय: “हनी ट्रॅपचा गंध… आणि सिस्टीमची गूंगी!”l


✍️ संपादकीय: “हनी ट्रॅपचा गंध… आणि सिस्टीमची गूंगी!”

 

 

एका पंचतारांकित हॉटेलच्या भिंतीआड चालणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या खेळात, सत्ता, सौंदर्य आणि सिस्टीम एकत्रितपणे झुलताना दिसत आहेत. वरवर पाहता हे ‘फक्त एक हनी ट्रॅप प्रकरण’ वाटतं — पण वास्तवात ही लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी यंत्रणा आहे.

“ग्लॅमर” चा मुखवटा, फाडून अवघी प्रतिष्ठा “गिळंकृत” करणारा हा खेळ अलीकडच्या काळात सहज प्रक्रिया झाली आहे.

जेव्हा सौंदर्य हे संधी बनतं आणि मोह हे अस्त्र, तेव्हा व्यवस्थेतील सजगतेची कसोटी लागते.या प्रकरणात अनेक अधिकारी, नेते, उद्योगपती, एकूणच व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ एकेक करून या जाळ्यात अडकवंले जातात. काहींचे आयुष्य उद्ध्वस्त होते, काहींचे झाले, काहींच्या ‘नैतिकतेचे मुखवटे’ गळून पडतात.ही फक्त लैंगिक फसवणूक नव्हे, तर संस्थात्मक भ्रष्टाचाराचा एक अत्यंत सुसंस्कृत प्रकार आहे.

जेंव्हा व्यवस्था केवळ प्रेक्षक म्हणून वावरू लागते तेंव्हा हा खेळ खेळणारे अधिकच बिनधास्त होऊन रंगात येतात. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – पुरावे “गहाळ” होतात, फाईली “हरवतात”, क्लिप्स “वायर्ड” होतात.कोणताही मोठा गाजावाजा न करता सगळं थांबतं.सत्तेच्या जवळ असलेल्या गुन्हेगारांना प्रश्न विचारण्याची व्यवस्थेची इच्छाशक्ती हरवलेली असते.जे गप्प राहिले, तेही दोषी ठरतात.

या “हनी ट्रॅप ऑपरेशन” मध्ये वापरल्या गेलेल्या महिलांचा मुद्दाही तितकाच गंभीर आहे.या महिला स्वतः सहभागी होत्या की फसवून वापरल्या गेल्या?याची सखोल होत नाही. अशा प्रकरणांमध्ये स्त्रियांना माध्यम बनवून बळी देण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या आयुष्याचं नुकसान अनमोल असतं.

अशा परिस्थितीत पत्रकारितेचं दायित्व अधिक वाढते.

जेव्हा सत्ता झुकते, चुकते , तेव्हा पत्रकारितेची लेखणी ताठ उभी राहायला हवी.गेल्या काही वर्षांत पत्रकारांनी जबरदस्त संशोधन केलं, काहींनी जीव धोक्यात घालून सत्य उघड केलं. पण जेव्हा वास्तव न्याय मिळवत नाही, तेव्हा प्रश्न निर्माण होतो “आपण फक्त सत्य शोधतो आहोत… की त्याचा अंत्यसंस्कार?”असा प्रश्न मन अस्वस्थ करतो.

Advertisement

आज नाशिक, ठाणे,मुंबई, नवी मुंबई या चार शहरांना केंद्रस्थानी ठेवून एका हॉट विषयाचे चर्वण सुरु आहे. एरवी एखाद्या थंड, अर्थ हीन मुद्याचा किस काढणारी यंत्रणा या हॉट विषयात मात्र थंड पडली आहे. पत्रकारिता देखील सोईची आणि टीआरपीसाठी आवश्यक तेव्हढी सन सनी निर्माण करण्याइतकीच या प्रकरणाची उब घेत आहे.

खरं तर आज चर्चेत आले म्हणून हे प्रकरण ताजे नाही. या प्रकरणाची सुरुवात खूप आधीच झालेली आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या “त्या” महिलेचे अनेक कारनामे आहेत. सन २००९ नंतर या महिलेचा खऱ्या अर्थाने उदय झाला. काही खासदार, काही आमदार यांच्याशी जवळीक साधून आपले ईप्सीत साध्य केल्याचे अनेक किस्से आहेत. या क्षेत्रातील तीची अर्हता जवळून माहित असल्यानेच सॉलिटिअर म्हणून तीचा खुबीने वापर करून ते ७२ सावज टिपण्याचे षडयंत्र तितक्याच चलाखीने यशस्वी केले.यामागचा सूत्रधार काही कच्चे लिंबू नाही.राजकीय, सामाजिक खाचखळगे, आणि मानसिकतेचा चांगला अभ्यास असलेला हा कधी काळचा युवा नेता स्मित हास्य करून सावज जाळ्यात ओढायचा. मधुर वाणीने आपलंस करीत भक्ष्य समोर ठेवायचा आणि कार्यभार उरकून घ्यायचा. अशा मार्गानेच सारी संपत्ती कमावलेली असल्याने लाज लज्जा, शरम, नितिमूल्य, समाज, शासन प्रशासन याची कुठलीच तमा बाळगण्याइतपत तो निर्ढावला. त्याने केलेले हे उद्योग सर्वज्ञात आहेत. कुणीच अनभिज्ञ नाहीत. महसूल, पोलिस, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्वपक्षीय आजी मंत्री या कुणापासूनही त्याचे कारनामे लपलेले नाहीत. मग यात तपास कुणाचा आणि काय करायचा? सारी नौटंकी आहे.

हे प्रकरण संपणार नाही,ते फक्त थांबवण्यात येईल.

“सॉलिटिअर” पुन्हा सक्रिय होईल. सॉलिटिअर आज कुठे आहे, याचा कुणालाही पत्ता नाही.पण ती एक व्यक्ती नाही… ती एक ‘पद्धत’ आहे… जी पुन्हा कुठूनही, कधीही, आणि कुणावरही हल्ला करू शकते.”म्हणून व्यक्तिगत सावध राहून प्रतिकार करणे हेच अस्र सुसंस्कृत व्यक्तीच्या हातात आहे.फरक इतकाच की, आतल्या दिव्यांखालची सावली आपल्याला कधीच दिसणार नाही, कारण ट्रॅपच्या या हनीचा गंध एव्हढा मधुर आहे की सिस्टीम नेहमीच त्या गंधाच्या गुंगीत निद्रिस्त असेल.

✒️ –कुमार कडलग

नाशिक

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *