नाशिक जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री बड्या धेंड्यावर कारवाई कधी करणार ?
नाशिक जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री
बड्या धेंड्यावर कारवाई कधी करणार ?

प्रशांत हिरे / सुरगाणा
नाशिक जिल्ह्यात व तालुक्यात बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करण्यास प्रशासकीय यंत्रणा हतबल असल्याचे दिसुन येत असुन या बेकायदा गुटखा विक्रीस कोणाचा वरदहस्त आहे याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा आहे.याबाबत नागरिक आजही अनभिज्ञ आहेत.नाशिक जिल्ह्यात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या गुटखा विक्री होत असुन आज राज्यात बंदी असतानाही सर्रासपणे याची विक्री होत आहे.गावपातळीवर पानाच्या टपरीपासुन ते किराणा दुकानापर्यंत तसेच शहरात गल्लोगल्ली,कोपरा-कोप-यावर, नाका-नाक्यांवर हा गुटखा सहज उपलब्ध होतो.त्यामुळे गुटख्यावर बंदी आहे कि नाही ? मग बंदी चा फार्स कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो.इतक्या सहजपणे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ सहजपणे उपलब्ध होत असल्याने या मागे मोठे अर्थकारण असुन गुटखाबंदी असतानाही अशा अवैध विक्रेत्यांची माहिती अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाला माहितच नाही कि याचं गांभिर्य या विभागाला नाही असा सवाल व्यक्त केला जात आहे.राज्यात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर निर्बंध असुन राजरोसपणे होत असलेल्या विक्रीमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे.माञ या गोष्टीकडे संबंधित विभाग पुर्णपणे दुर्लक्ष करत असुन या गुटखा विक्रीच्या बड्या धेंड्यावर खरंच कारवाई कोण करेल का असाही सवाल होत आहे.नाशिक जिल्ह्यात व तालुक्यात ग्रामीण या भागात सर्वात जास्त परप्रांतिय कामगारांची वर्दळ असते.त्याचप्रमाणे दिंडोरी वणी पेठ सुरगाणा या भागातही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असल्याने या भागासह छोटया-मोठ्या गावांत इतकेच काय वाड्या-वस्त्यांवरील छोट्या-मोठ्या टप-यांमधुन राजरोसपणे गुटखा विक्री होत असताना कडक कायद्याचे अंमलबजावणी करणारे प्रशासनच या गंभीर मुद्द्याकडे जाणिवपुर्वक डोळेझाक करत आहे.जिल्हात शहरीकरण,पंचतारांकित वसाहत अन मोठी बाजारपेठ यामुळे या तालुक्यात परराज्यांतुन गुटखा विक्रीसाठी येत असुन त्याचे मोठ-मोठे विक्रेत्यांकडुन हा गुटखा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत सहजपणे पोहोचविला जातो.या गुटखामाफियांची एकप्रकारे मोठी साखळीच निर्माण झालेली आहे.हे सर्व विक्रेते गुटखा व अशा तंबाखुजन्य पदार्थांची मोठ्याप्रमाणावर साठा करत असुन या सर्व गोष्टी प्रशासनाला माहित नाही काय ? असा प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे.राज्यशासनाने ज्या उद्देशाने गुटखाविक्रीवर निर्बंध घातले,त्या मुळ उद्देशालाच संबंधित विभाग व प्रशासनाने हरताळ फासला आहे.अवैध गुटखाविक्री करणा-या माफियांकडुन,प्रशासनाने मुक संमतीदिल्याप्रमाणे आमच्यावर कोणीच कारवाई करु शकत नाही या अविर्भावात गुटखामाफिया वावरत आहेत.राज्यात सर्वञ गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी असताना बहुतांश शासकिय कार्यालयातील कर्मचारीच खुलेआम नागरिकांसमोर गुटखा खाताना व तंबाखुजन्य पदार्थ चघळत असल्याचे दिसत असल्याने कायद्याचे रक्षण करणा-यांकडुनच कायद्याची पायमल्ली होत असल्याचे चिञ शहर व तालुक्यात पहावयास मिळत असल्याने याच अधिका-यांकडुन बंदीची अपेक्षा कशी ठेवायची ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. जिल्हातील अनेक शासकिय कार्यालय परिसरात गुटखा बंदी असताना शासकिय कार्यालयात भिंती, कोप-या-कोप-यात पिचका-या मारुन मोठ्या प्रमाणावर घाण केली जात आहे. जिल्हातील अनेक विक्रेते अवैधरित्या गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा करत असुन गुटखा विक्रीने थैमान घातले आहे. यांवर कोण अंकुश घालणार ? या विक्रेत्यांवर कधी कारवाई होणार याकडे शहरासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असुन जर खरेच बंदी करायची असेल तर बेकायदेशीर गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-या बड्या धेंड्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी नागरिकांमधुन होत आहे.
अव्वाच्या सव्वा दराने विक्री:
प्रतिबंधित गुटख्याची विक्री चोरी छुप्यारीतीने व्यावसायिकांकडून केली जाते. एका पुडीच्या किमतीपेक्षा तीन ते चार पटीने व्यावसायिकांकडून त्याची विक्री केली जाते. विशेषतः ठराविक पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, किरणा दुकानांवर याची सर्रासपणे विक्री होते. तर, दुसरीकडे ज्या विभागाकडे यावर कारवाई करण्याचे अधिकार आहे, तो अन्न व औषध प्रशासन विभागाच कारवाईबाबत उदासीन आहे.



