सिग्नल यंत्रणेची असून अडचण नसून खोळंबा संगमनेर शहर पोलिस यंत्रणेचा अस्तव्यस्त वाहतुकीवर अंकुश केव्हा?
सिग्नल यंत्रणेची असून अडचण नसून खोळंबा
संगमनेर शहर पोलिस यंत्रणेचा अस्तव्यस्त वाहतुकीवर अंकुश केव्हा?
शिवाजी पुतळ्याजवळ ट्रक भीषण अपघाताने घेतला महिलेचा बळी
Advertisement
दुनियादारी /संगमनेर
संगमनेर शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून या घटनेला शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेची उदासीनता कारणीभूत असल्याची चर्चा आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण, अतिक्रमाणाकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, वर्दळीच्या परिसरात अवजड वाहनांची वाहतूक, अरुंद रस्त्यावर दुतार्फा आणि एकेरी वाहतुकीचा उडालेला फज्जा यांसारख्या बाबीकडे वाहतूक शाखेचे अक्षम्य दुर्लक्ष, अपेक्षित पॉईंटवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसणे अशा उणीवांमुळे संगमनेर शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून अनेक अपघात होऊ लागले आहेत यात निर्दोष पादचारी, दुचाकी स्वारांचा बळी जात आहे. अशाच एका दुचाकी मोपेड व ट्रकच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी दिं. १३ जानेवारी रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडली आहे.
या घटनेत आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या वाहनाला धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात नीतू सोमनाथ परदेशी ही महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून मृत झाली आहे. या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ जखमी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मयत महिला नेहरु चौकातील सोमनाथ परदेशी यांच्या पत्नी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास एक रिकामा मालट्रक (क्र. एम.एच. 20/ ए 5858) बसस्थानकांकडून दिल्ली नाक्याकडे जात होता. सदरील मालट्रक अतिशय गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आला, त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्या मोपेडवरुन महामार्ग ओलांडत असताना नीतू सोमनाथ परदेशी (वय 37, रा. पानसरे गल्ली, नेहरु चौक) यांच्या मोपेडला ट्रकची धडक बसली. त्यामुळे त्यांची मोपेड ट्रक खाली अडकली. यावेळी ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र वाहन जागेवर न थांबता काही अंतर पुढे गेल्याने पुढील चाकातून वाचलेल्या परदेशी पाठीमागील चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या.
या घटनेनंतर आसपास जमलेल्या नागरिकांनी धाव घेत जखमी झालेल्या महिलेला तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संगमनेर शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर संगमनेरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिग्नल असून अडचण नसून खोळंबा
संगमनेर शहरातील चौका चौकात सिग्नल असुन अडचण नसून खोळंबा आहे. संगमनेर शहरातील वाहतुकीवर कुणाचाही अंकुश राहिला नाही. उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व बैलगाड्या हे देखील शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून वाहतूक करत असल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. संगमनेर शहर पोलीस आता तरी वाहतुक व्यवस्थेकडे लक्ष देतील का..? सदर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गाढ निद्रेत असलेले वाहतूक पोलीस आता तरी जागे होतील अशी आशा आहे.