भारतीय राज्यघटना जगात श्रेष्ठ – माजीमंत्री बाळासाहेब थोरात अमृत उद्योग समूहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
भारतीय राज्यघटना जगात श्रेष्ठ – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
अमृत उद्योग समूहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
संगमनेर ( प्रतिनिधी )


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना समतेचा अधिकार देणारी राज्यघटना भारतीयांना मिळाली. ही राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असल्याचे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संचालक रामनाथ कुटे, मदन आंबरे,दिलीप नागरे, जगन्नाथ आव्हाड,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, उपस्थित होते तर इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रमात माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व सर्व विभागांचे प्राचार्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढा झाला. 1942 च्या चळवळीमध्ये देशातील सर्व घटकांमधील नागरिकांनी सहभाग घेतला. या आंदोलनात तीर्थरूप सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ.आण्णासाहेब शिंदे , धर्मा पोखरकर, कॉम्रेड पी.बी.कडू पाटील, पी.जी.भांगरे, रावसाहेब शिंदे यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला. दादांना दीड वर्ष कारावास झाला. भारतीय स्वातंत्र्याला मोठी परंपरा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटनेने सर्वांना समतेचा अधिकार दिला. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे वैशिष्ट्य असून बंधुता, समता हा विचार सांगणाऱ्या राज्यघटनेला जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने शिक्षण,कृषी,विज्ञान अशा सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. महाराष्ट्राने ही प्रगती केली असून अनेक अडचणी आहेत. संगमनेर मधील सहकारी संस्था या राज्यातील अग्रगण्य संस्था असून शिक्षण संस्था या गुणवत्तेच्या आहेत. निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केल्याने तालुक्यात दोन्ही कालव्यांमधून पाणी आले आहे. आर्थिक समृद्धी आणि विचारांची समृद्धी येण्यासाठी काम आपण केले असून समतेचा विचार देणारी राज्यघटनेची तत्वे आणि लोकशाही जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे तर विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रांमध्ये गुणवत्तेमधून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, स्वातंत्र्याला अर्थ देणारे भारतीय प्रजासत्ताक आहे. समता, बंधुता ही वैशिष्ट्य असणाऱ्या राज्यघटनेचा प्रत्यक्ष नागरिकांनी समजून घ्यावा. मूलभूत तत्वांचे पालन करावे लोकशाही आणि राज्यघटना सशक्त करणे गरजेचे असून तिची मूल्य प्रत्येकाने जपली पाहिजे. इतक्या वर्षानंतर ही देश विकसनशील असून विकसित झाला नाही याची खंत प्रत्येकाला असणे गरजेचे असून राष्ट्रीय एकात्मता, समता आणि न्याय या तत्त्वावर अवलंबलेली राज्यघटना सर्वांनी जपा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा अधिकारी मोहनराव म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरक्षा जवान व विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मानवंदना दिली तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुरक्षा अधिकारी नरेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मधील विविध विभागांमधील विद्यार्थ्यांनी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व सौ. शरयूताई देशमुख यांना मानवंदना दिली.
यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक, नागरिक व महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



