सामाजिक संघटनांच्या वज्रमुठीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ; दोषींना माफी नाही, महामंडळाला ७०० कोटी, सारथीलाही भरघोस निधी
सामाजिक संघटनांच्या वज्रमुठीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद ;
दोषींना माफी नाही, महामंडळाला ७०० कोटी, सारथीलाही भरघोस निधी
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या अन्याय, अत्याचार,सामाजिक असंतोष, शेतकरी आणि घटनात्मक मूल्यमापनाच्या पार्श्वभूमीवर “वज्रमुठ – सर्व महाराष्ट्रातील सामाजिक संघटना” या व्यासपीठाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे सविस्तर चर्चा झाली.या बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण कामगार नेते अभिजीत राणे उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री महोदयांसमोर १० प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव मांडले.
या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आश्वासने दिली:
गुन्हेगारांवर कठोर कारवाई – ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे.त्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल,असे त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
🔹शेतकरी कर्जमाफी – शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल,तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवले जाईल,असा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिला.
🔹अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथीला निधी – अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी ७०० कोटी रुपये आणि सारथी शिक्षण संस्थेला भरघोस निधी राज्य सरकारकडून तत्काळ वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🔹नवीन महामंडळाची घोषणा – स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, ज्यातून सामाजिक बांधिलकी जपली जाईल.
🔹लोकप्रतिनिधी मार्गदर्शन शिबीर – सर्व मंत्री आणि आमदारांसाठी दोन दिवसीय ‘जनसेवा व लोकसंपर्क’ मार्गदर्शन शिबिर घेण्याची सूचना सकारात्मक दृष्टीने त्यांनी स्वीकारली.
ही बैठक संघर्ष नव्हे तर संवादासाठी होती आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे,असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी दिला.
वज्रमुठ व्यासपीठ सरकारला पुढील काळात जनतेचा आवाज पोचवण्याचे कार्य करत राहील,मात्र जर दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाही तर घटनात्मक चौकटीत आंदोलक स्वरूपात सर्व संघटना पुन्हा एकत्र येतील याचा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला.
यावेळी या शिष्टमंडळात छावा क्रांतिवीर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करण गायकर अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे छावा क्रांतिवीर सेनेचे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ किरण डोके चंद्रशेखर विशे सदा पुयड सुनील कदम अविनाश कदम अमोल शिंदे भारत पिंगळे संकेत पिंगळे दशरथ कपाटे सुभाष कोल्हे दिलीप गवळी मनीष तिवडे योगेश पाटील राजेश चव्हाण विशाल देवणे उत्तम बिराजदार मनोज पाटील मच्छिंद्र चिंचोले राधेश्याम पवळ साई पाटील शंकर जाधव आदींसह शिष्टमंडळात महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.