*महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प –आमदार अमोल खताळ*
*महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प –आमदार अमोल खताळ*
संगमनेर :प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, आरोग्य क्षेत्र आणि उद्योजकांसाठी आश्वासक ठरला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.
“आज सादर झालेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले खंबीर पाऊल आहे. बळीराजाच्या कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती अधिक सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसतो,” असे आमदार खताळ यांनी सांगितले.
फलोत्पादन वाढीसाठी नारळ, काजू, चंदन आणि अक्रोड उत्पादनावर भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. “कोकणातील नारळ बागायतदारांसाठी ‘कोकोनट प्रमोशन स्कीम’ आणि प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच मत्स्योद्योगाची पुरवठा साखळी सशक्त करून मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.
शेतीत एआयचा वापर वाढवण्याबाबत बोलताना आमोल खताळ म्हणाले, “‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ हे बहुभाषिक एआय टूल विकसित केल्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. दुग्धव्यवसाय, कुकुटपालन आणि मत्स्यव्यवसायासाठी दिलेले विशेष अनुदान ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे आहे.”
तरुणांसाठीच्या तरतुदींबाबत त्यांनी सांगितले, “१५ हजार माध्यमिक शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ स्थापन करणे आणि गेमिंग व VFX क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय हा भविष्यातील रोजगार संधी लक्षात घेऊन घेतलेला आहे.”
आरोग्य क्षेत्रात दिलेल्या सवलतींचे स्वागत करताना खताळ म्हणाले, “कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांवरील कर कमी केल्यामुळे उपचार अधिक परवडणारे होतील. अपघात विमा करमुक्त केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तीन नवीन ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ची स्थापना आरोग्य सुविधांना बळ देणारी ठरेल.”
औद्योगिक विकासावर भाष्य करताना ते म्हणाले, “२०० जुने औद्योगिक क्लस्टर्स पुनरुज्जीवित केल्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. ४० हजार कोटींच्या तरतुदीसह सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देणे आणि डेटा सेंटर कंपन्यांना ‘टॅक्स हॉलिडे’ देणे हे भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. महिला उद्योजकांसाठी ‘She-Marts’ आणि मुलींच्या शिक्षणासाठी हॉस्टेल उभारणी हे निर्णय सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारे आहेत.”
“शेती, उद्योग, तरुण आणि आरोग्य क्षेत्राला समान प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला देशातील आघाडीचे राज्य बनवण्यात मोलाची भूमिका बजावेल,” असा विश्वास आमोल खताळ यांनी व्यक्त केला.



