*या बलिदानास जबाबदार कोण ?* भ्रष्ट व्यवस्थेवर जबाबदारी निश्चित होईल का …. आपली दुनियादारी / कुमार कडलग
*या बलिदानास जबाबदार कोण ?*
भ्रष्ट व्यवस्थेवर जबाबदारी निश्चित होईल का ….
आपली दुनियादारी / कुमार कडलग
राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागात चालक पदावर काम करणारे कैलास कसबे यांचा दुर्दैवी अपघात झाला.आणि त्यात ते मृत्युमुखी पडले.त्यांचा हा अपघात नाही तर घात आहे.मृत्यू नाही तर ते बलिदान आहे.कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले आहेत.तर सोबत लासलगाव पोलिस ठाण्याचे डोंगरे आणि निकम हे दोन पोलिस कर्मचारी देखील गंभीर जखमी आहेत.
प्रथम दर्शनी हा अपघात असल्याची चर्चा असली तरी हा अपघात नाही तर तो भ्रष्ट व्यवस्थेने केलेला घात आहे.कर्तव्य बजावत असलेल्या कैलास कसबे यांचा या भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला आहे.दैव बलवत्तर होते म्हणून लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी जखमेवर बचावले.
मनमाड चांदवड रोडवर पर राज्यातून अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या क्रेटा गाडीचा भरधाव वेगाने पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्कच्या वाहनाला कट मारल्याने एक्साइजच्या पथकाची गाडी चांदवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरनुल गावाजवळ शेतात पलटी झाली. या अपघातग्रस्त वाहनाची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते.
अपघातानंतर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख पोलिस अधीक्षक आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी घटना स्थळी पोहचले.आवश्यक ते सोपस्कार पर पाडले.विधिमंडळाच्या सभागृहात देखील या अपघाताचा मुद्दा उपस्थित झाला.मंत्री महोदयांनी शिरस्त्याप्रमाणे चौकशीचे आदेशही दिलेत.पळून गेलेले गुन्हेगारही पकडले जातील.कर्तव्य बजावताना बलिदान झाले म्हणून शासकीय भरपाई आर्थिक स्वरूपात दिली जाईल.मात्र गेलेला जीव कसा मिळविणार ?कुटुंबाला मुलाचे ,पतीचे पित्याचे, भावाचे छत्र कसे मिळवून देणार?
या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना तरी निदान हे बलिदान का झाले याचा सारासार विचार यंत्रणेने करायला हवा.बाहेरच्या राज्यातून बिन बोभाटपणे दारू गुटख्याची तस्करी होते,जिल्हा अंतर्गत गोवंशाची तस्करी होते.तेव्हा यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत जगते. व्यवस्थेच्या परिघाबाहेरील एखादे असे प्रकरण नजरेच्या टप्प्यात येते तेव्हा मात्र जीवावर उदार होऊन तस्करांच्या मुसक्या बांधण्याचा दबाव टाकला जातो.आणि भ्रष्ट व्यवस्थेने पोसलेल्या या मुजोर प्रवृत्ती असे बळी घेतात.
खरे तर प्रत्येक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाके आहेत.इथेच पहिली चाळणी लागायला हवी.मात्र या चाळणीची भोके रुंदावल्याने ही चाळणी फितूर होते.आणि पुढे सारेच मंगल ..पोलिस यंत्रणा असो नाही तर राज्य उत्पादन शुल्क अथवा एफ डी ए.,सारेच या तस्करांना अभय देत आहेत तोपर्यंत अशा अप्रिय घटना टाळणे कुणाच्याच हातात नाही .